मुख्य सामग्रीवर वगळा

एक स्वप्न असंही - भयकथा



नमस्कार मित्रांनो मी किरण मी तुम्हाला मला पडलेला भयानक स्वप्नाचं वर्णन थोडक्यात सांगत आहे. हे स्वप्न मला साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी पडलं होतं पण अजूनही ते स्वप्न आठवलं तर अंगावरती काटा येतो.

मित्रांनो मी शेतातलं दिवस भराचं काम संपवून घरी आलो. घरचं थोडं काम उरकून घेतले आईने केलेली गरमा - गरम भाजी - भाकरी खाल्ली आणि अंथरुनावर आडवा झालो. त्या दिवशी दिवसभर राबल्यामुळे झोप लगेचच लागली. शरीरात थकवा होता, आणि डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे झोप पण लगेच लागली. परंतु, झोपल्यावर काही मिनिटांतच एक विचित्र स्वप्न पाहायला सुरुवात झाली, आणि माझ्या शांत झोपेची वाट लागली.

त्या स्वप्नात मी माझ्या गाडीवर प्रवास करत होतो. रस्ता ओसाड होता. आजूबाजूला घनदाट जंगल होते. मावळतीचे रंग आसमंतात पसरले होते. आणि थोडं पावसाचे वातावरण झाले होते. मी माझ्या विचारांच्या गर्दीत गाडी चालवत होतो. कुठेही मानव वस्तीचा मागमुस नव्हता. रस्ता ही ओळखीचा वाटत नव्हता. तरी मी पुढे चाललो होतो. आणि त्यातच एकाएकी मला समोर दिसले की कोणीतरी लिफ्ट साठी हात पुढे करत आहे. मी गाडी थांबवली. पण गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे गाडी थोडी पुढे जाऊन थांबली. मी पाठीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते. मला थोडा संशय आला. “मला भास झाला असावा का?” असा विचार करत गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघालो. 

काही अंतर गेल्यावर तीच व्यक्ती पुन्हा हात करून गाडी थांबवायला सांगत होती. मी गाडी न थांबवता फक्त गाडीचा स्पीड कमी केला आणि पाठीमागे वळून पाहिले तर पुन्हा तेच- पाठीमागे कोणीच नव्हते. आता अंगावर काटा आला होता. मनात विचार सुरू झाला की, "हे काय घडतंय? "ही व्यक्ती कोण आहे? मला पुन्हा पुन्हा का दिसते आहे ?" असे विचार सुरू झाले. हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो आहे. असं मला जाणवू लागलं गाडीच्या स्पीड बरोबर माझ्या मनाचा गोंधळही वाढत होता. थोडं पुढे गेल्यावर, अचानक मला वाटू लागलं की माझ्या पाठीमागे गाडीवरती कोणीतरी बसले आहे. ती व्यक्ती त्याचा हात हळूहळू माझ्या गळ्याकडे घेऊन गळा दाबू लागली होती. माझ्या हेल्मेटचा स्ट्रॅप ती व्यक्ती पाठीमागे खेचत होती, जणू माझा श्वास रोखण्याचा प्रयत्न केला जात होता. माझा एक हात गाडीच्या हँडलला तर दुसरा हात गळ्यातल्या हेल्मेटच्या स्टॅपला होता. मला एका हाताने गाडीचा तोल सावरला नाही. आणि गाडी घसरून खाली पडली‌. जशी गाडी खाली पडली तसा मी सुसाट जंगलाच्या दिशेने पळत सुटलो. मी खूप घाबरलो होतो 

जंगल दाट होतं, थोडा अंधार पसरला होता. पावसाच्या वातावरणामुळे आकाश काळ्या ढगांनी झाकलं होतं आणि कडाडणाऱ्या वीजा वातावरणाला अधिक भयावह बनवत होत्या. झाडांच्या फांद्या विचित्र आकार घेत होत्या, जणू त्या मला पकडायला पुढे येत होत्या. माझ्या मागे पळणाऱ्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. ते कोण होतं, हे मागे वळून बघायची पण माझी हिंमत होत नव्हती. मी फक्त पळत होतो, पळतच राहिलो. ती व्यक्ती माझ्या मागे मोठ्या वेगाने पळत होती, आणि आता त्यांचा श्वास माझ्या कानावर ऐकू येत होता. मी जीव तोडून पळत होतो. माझ्या डोक्यात एकच विचार होता - "पळ, फक्त पळ!" पळता पळता अचानक माझ्या पाठीमागे येणाऱ्या पावलांचा आवाज बंद झाला. त्यामुळे मी थोडं स्थिरावलो पण तेवढ्यात माझ्या समोर एक विचित्र माणूस उभा राहिला. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग आणि क्रौर्य होतं. त्याचा एक डोळा फुटला होता तर कानातून रक्त बाहेर येत होते. एका हाताची बोटे तुटलेली दिसत होती. जसं मी हळुहळू मागे सरू लागलो. तसा तो हळूहळू माझ्याकडे येऊ लागला अचानक माझा तोल गेला, आणि मी जमिनीवर कोसळलो. त्याने संधी साधून माझ्या अंगावर उडी मारली. माझा गळा आवळू लागला. मी तडफडत होतो, त्याच्या पासून निसटण्याचा प्रयत्न करत होतो. पण मला निसटता येत नव्हते. त्याच्या ताकदीपुढे हतबल होतो. आरडा ओरड करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आवाज निघत नव्हता. त्यावेळी वाटलं की, "इथून बाहेर पडणं आता अशक्य आहे."

त्या भयानक स्वप्नात माझी तडफड सुरूच होती. अचानक माझी झोप मोडली, आणि मी जोरात धसकून जागा झालो. माझं अंग घामाने भिजलं होतं, आणि हृदय जोरात धडधडत होतं मला जाग आली तेव्हा माझ्या अंगावर गोधडी होती, मला माझ्या तोंडावरची गोधडी काढायची देखील माझी हिंमत होत नव्हती. मला सतत असं वाटत होतं की कोणी तरी माझ्या डोक्याजवळ उभं आहे. कधी नव्हे ती खरी भीती वाटत होती. दोन - तीन मिनिटांनी थोडा धीर गोळा करून मी तोंडावरची गोधडी बाजूला केली. अवती भोवती पाहिलं, तर कोणीच नव्हतं. आई - बाबा बाजूलाच शांत झोपलेले होते. माझ्या मनात प्रचंड गोंधळ चालू होता. मी हळूच ऊठुन पाणी प्यायला खिडकीजवळ गेलो. आणि खिडकीत ठेवलेला पाण्याचा भरलेला ग्लास गट गट करत पिऊन टाकला. आजू बाजूला बघत बाहेर आलो, बाहेर आल्यावर थंड हवेची बारीक लहर अंगाला लागली तेव्हा कुठे थोडसं बरं वाटलं आणि नंतर अंथरूणावर जाऊन डोळे मिटून घेतले व थोड्या वेळातच मला शांत झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देखील त्या स्वप्नाचा परिणाम माझ्या मनावरती झाला होता. ते स्वप्न फक्त डोळ्यांसमोरच नव्हे, तर मनात खोलवर घर करून बसलं होतं. त्या घटनेचं कारण काय असावं, असा विचार वारंवार येत होता. ते फक्त एक भयावह स्वप्न होतं, की मनाचा गोंधळ? त्याचं वर्णन करणं अवघड होतं, पण त्याची भीती माझ्या मनावर सतत ठाण मांडून होती. जणू काही त्या अनुभवाने माझ्या मनाचा ठावच घेतला होता. जेवण करताना, शेतात काम करताना, इकडे तिकडे जाताना – त्या भयानक स्वप्नाचं प्रतिबिंब माझ्या डोळ्यासमोरून हटतच नव्हतं.

पण मला त्याचं कारण समजत नव्हतं. कदाचित, ते माझ्या अंतर्मनातल्या दबलेल्या भीतीचं किंवा तणावाचं प्रतीक होतं. त्या अनुभवाने मला समजलं की, कधी कधी आपलं मन आपल्याला आपल्या समस्यांबद्दल सांगण्यासाठी अशा स्वप्नांचा आधार घेतं. तसंच काहीच झालं असावं का?...  पण त्या रात्रीचा तो भयानक क्षण मात्र कायमचा माझ्या स्मरणात राहणार आहे.


समाप्त.


इतर कथा

रात्रीचा शापित प्रवास- भयकथा

शेतातील घर (भाग-१)- भयकथा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनोळखी रस्ता- भयकथा

(ही कथा काल्पनिक असून या कथेचा कुठल्याही गोष्टींशी संबंध लावू नये ही नम्र विनंती. ) नमस्कार मित्रांनो ही घटना माझ्यासोबत गेल्या सीझनला म्हणजेच दीड वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्यावेळी नुकताच उसाचा कारखाना चालू झाला होता. ट्रॅक्टर वर माझ्या गावातील एक होतकरू नवीन मुलगा ड्रायव्हर म्हणून ठेवला. मग मी माझी बाकीची कामं आणि ऊसतोड कामगारांवर लक्ष देऊ लागलो. सगळे ऊसतोड कामगार कामाला लागले. सगळं सुरळीत चालू झालं होतं. पण दहा - पंधरा दिवसातच ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर काही कारणास्तव काम सोडून गावी निघून गेला. दुसरा ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे मी स्वतःच माझ्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बनलो.  ऊस तोडीच्या धंद्यात मी पण नवीनच उतरलो होतो. त्यामुळे मी आजूबाजुच्या बाकीच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सोबत ओळख करून घेतली. कारण कारखान्यावरती येता जाताना त्यांच्या शिवाय दुसरं कोणीच माझ्यासाठी सोबतीचं नव्हतं. मी त्यांच्या सोबतच कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागलो. पण महिन्याभरातच माझ्यासोबत अशी घटना घडली. ज्या घटनेची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्या घटनेने मला हादरवून सोडले. त्या दिवशी पहाटेच मी खेप खाली करून कारखान्...

हा खेळ सावल्यांचा- भयकथा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एका गावातुन दुसऱ्या गावातून फिरणं म्हणजे आम्हाला काही नवीन नव्हतं. तर ते आमचं रोजचंच झालं होतं. असंच एक दिवस फिरत फिरत एका पांडववाडी गावामध्ये गेलो. गाव तसं छोटसं होतं. पण डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे आणि त्या गावातील एका जुन्या वाड्या मुळे त्या गावाची वेगळीच ठेवण दिसत होती. तो वाडा राज घराण्यातील पाच भावंडांचा होता. तो वाडा एका बाजूने पडलेला होता जरी तो पडलेला असला तरी तो वाडा आमचे लक्ष वेधून आकर्षित करत होता. त्या वाड्याबद्दल आम्ही एका मुलाला विचारले असता त्याने सांगितले की हा वाडा खूप पूर्वीचा आहे. जो अनेक दशकांपासून पडून होता. रात्री तेथे विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे त्याने सांगितले.  तेवढ्यातच पुढे गेल्यावर हॉटेल जवळ झाडाखाली पाणी प्यायला म्हणून थांबलो. झाडाच्या पाऱ्यावरती एक आजोबा बसलेले होते. त्यांना त्या वाड्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की हा वाडा एकेकाळी राजघराण्याचा होता, गावातील लोक म्हणायचे की त्या वाड्यात कुणालातरी मारण्यात आलं आणि त्याचं आत्मा तिथे भटकतो. वाड्यात येणारा प्रत्येकजण त्या शापाचा बळी ठरतो. त्यामुळे आता तो ओसाड आणि भीतीदाय...