अकरावीचे प्रथम सत्र परीक्षेचे पेपर संपले आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या दिवाळीच्या सुट्ट्या तश्या फक्त आठ ते दहा दिवस होत्या नंतर जादा तास चालू झाले एके दिवशी ज्यादा तासांमध्ये ऐतिहासिक ठिकाणांचा विषय निघाला. त्यावेळी अकलूजच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी एक छोटीशी सहल काढली. अकलूज मध्ये सयाजी राजे पार्क, श्री गणेश मंदिर व इतरही बरीच ऐतिहासिक ठिकाण आहेत. पण त्यातली आम्ही दोन - तीन ठिकाणी फिरलो. पण त्यातलं सर्वात जास्त प्रेक्षणीय व मनाला शांती भेटणारे ठिकाण जर म्हटलं गेलं तर शिवसृष्टी किल्ला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या कारकीर्तीतील बऱ्याच प्रसंगांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे
शिवसृष्टी किल्ल्यावरचा अनुभव सांगण्या अगोदर आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊयात
शिवसृष्टी म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित चित्रांचे व शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन अशा शिवसृष्टी महाराष्ट्रात अनेक आहेत पण त्यात अकलूजची शिवसृष्टी प्रेक्षकांना जरा जास्तच आकर्षित करते ही शिवसृष्टी पुणे सोलापूर च्या मधोमध सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूर पासून 118 किलोमीटर तर पुणे पासून 167 किलोमीटर वर असलेले अकलूज हे पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे शिवसृष्टी, वॉटर पार्क आणि धार्मिक शांतीसाठी आपला देवी मंदिर व गणेश मंदिर पर्यटकांच्या समाधानात भर टाकते. या ऐतिहासिक स्थळांमुळे अकलूज ची ओळख आता पर्यटन स्थळ म्हणून झाली आहे. नीरा नदीच्या काठावर वसलेला शिवसृष्टी किल्ला उभा आहे. या किल्ल्याला भुईकोट किल्ला असेही ओळखले जाते. या किल्ल्याची उंची सुमारे 1598 फुट इतकी आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी म्युरल्स व पुतळे यांच्या सहाय्याने या किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केली आहे. मोहिते पाटील परिवाराने गडाच्या जीर्णोद्वारासाठी व शिवसृष्टीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत
पूर्वीच्या काळी संभाजी महाराज व इतर २६ जणांना मुकर्रब खानने संगमेश्वर येथून पकडून याच किल्ल्यावर आणले होते.
आम्ही तेथे गेलो तर कुठल्याच ऐतिहासिक ठिकाणाला एवढी गर्दी पाहिली नाही तेवढी गर्दी तेथे पाहिली पण सगळे एकदम शांत चित्ताने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील टिपलेले प्रसंग एकदम एकटक असे पाहत होते. किल्ल्याजवळ पोहोचल्या नंतर आम्हाला किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगाराखाना असून त्यात विविध वाद्यांचे पुतळे बसवलेले दिसले आम्ही तिकीट काढून किल्ल्यात गेल्यानंतर प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे जणू आपले स्वागत करतात असे वाटत होते. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने चालत गेलो तर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित फायबरचीमु र्ती पाहायला मिळतात. यातील सुरुवातीच्या तीन मुर्ती शिवजन्माच्या संबंधित आहेत. त्यानंतर आपल्याला तेथे शिवनेरीवरील शिवजन्म स्थानाच्या महालाची प्रतिकृती बनवलेली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला पहायला मिळतो. त्यानंतर तेथे शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटना मूर्तीच्या स्वरूपात दाखवल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्या मुर्तीं मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभाव, आवेश यांच्याकडे पाहिले तर पाहतच राहावे असे रेखीव आहेत. शेवटी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा देखील तेथे मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मूर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहऱ्यावरील भाव, डोळे या गोष्टी देखील पाहण्यासारखे आहे.
किल्ल्याच्या मधोमध असणाऱ्या उभ्या बुरुजावर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे आपण जर जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या आजूबाजूला पाहिले तर आपल्याला तेथील परिसराचे विहंगम दृष्य पाहता येते त्याचबरोबर बुरुजाचे एका बाजूला दोर लावून बुरुज चढणारे मावळे देखील आपल्याला पाहायला भेटतात. तसेच दुसऱ्या बाजूला शेकोटी पेटवून तेथे पहाऱ्यावरती बसलेले मावळे देखील आपल्याला पाहायला भेटतात.
किल्ल्याच्या तटावर जर पाहिले तर तेथे विविध जाती धर्मांचे मावळे आपल्याला पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले दिसतील यात तोफची, मशालची, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी, इ.चा समावेश केला गेलेला आहे हे पुतळे पाहत आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरून नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्रहालयात आलो या संग्रहालसमोरच हत्तीवरून दवंडी देणाऱ्या माळव्यांचा पुतळा उभारला गेला आहे संग्रहालयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबर मधील प्रतिकृती बनविल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड, देवगिरी, या किल्ल्यांचा समावेश केला आहे.
किल्ल्यात ठिकठिकाणी फुलझाडे हिरवळ व कारंजे आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका अगदी नेत्र सुखत होतो. किल्ल्यातून बाहेर पडल्यानंतर नदीकाठाने बुरुजाला लागून असलेले वाटेने गेल्यास तटबंदीतील हिरवळ व इतर पुरातन अवशेष देखील आपल्याला पाहायला भेटतात.
किल्ल्याची स्वच्छता, किल्ल्याचा रेखीवपणा तेथील बुरुज व म्युरल्स या सगळ्यांकडे पाहिलं तर मन प्रसन्न होऊन जाते
खरंच या किल्ल्यावर ऐतिहासिक वारसा जपला गेला आहे. माझ्या माहिती प्रमाणे हा पहिलाच किल्ला असेल जिथे ऐतिहासिक गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे येणाऱ्या पिढ्यांना त्यांचा सुवर्ण इतिहास आठवण्यासाठी आणि द ग्रेट शिवाजी राजे सयाजी राजे भोसले यांनी मराठा साम्राज्य कसे स्थापन केले हे जाणून घेण्यासाठी हे ठिकाण खरोखरच उपयुक्त आहे. प्रत्येक स्वाभिमानी भारतीय आणि तसेच परदेशी यांनी या आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्यायला हवी.
धन्यवाद...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा